महामानवाला अभिवादन !
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी केलेल्या कार्यापासून जगानं प्रेरणा घेतली. शतकानुशतnके अन्याय सहन करणा-या दलितांना त्यांनी खरं स्वातंत्र्य दिलं. देशातल्या परिवर्तनाच्या चक्राला ख-या अर्थानं गती दिली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच.
सामाजिक विषमता, विषमताजनक सामाजिक व्यवस्था आणि अन्यायाविरूद्ध अविरत संघर्ष यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या तमाम दलितांची शतकानुशतकाच्या जोखडातून मुक्तता केली. देशातल्या सर्व नागरिकांना समान दर्जा मिळाला. समता हाच राज्यघटनेचा आत्मा आहे. आणि यामुळेच जगात भारताची राज्यघटना श्रेष्ठ मानली जाते.
घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळेच आपला देश एकसंघ राहण्यास मदत झाली. वेगवेगळे धर्म, जाती, संस्कृती, परंपरा या सर्वांना राज्यघटनेच्या चौकटीत स्वातंत्र्य मिळालं.
स्वतंत्र भारताला राज्यघटना मिळाली. मात्र इथल्या समाजात जातियवादी मनोवृत्ती कायमच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्याची चांगलीच माहिती होती. धर्मांतर करण्याच्या आधीपासूनच त्यांनी हिंदू धर्मातल्या जातियवादावर टीका करून मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला.
‘दलित वर्गाच्या हाती राजकीय सत्ता गेली की, चातुर्वर्ण्यजन्य विषमता धुळीस मिळालीच असे समजावे. आजवर ती टिकली आहे याचे कारण राज्यसत्तेचा तिच्यावर कधीच मारा झाला नाही हे होय’, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्यातून त्यांनी सांगितलेल्या राज्यकर्ती जमात व्हा, हा संदेश किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं.
दलितांना नवी ओळख हवी असेल तर त्यासाठी हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय पर्याय नाही, याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाणिव होती. त्यामुळे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. या अभ्यासातून बौद्ध धम्मासारखा समानतेचा अंगीकार करणारा दुसरा कोणताही धर्म नाही याची त्यांना जाणिव झाली. आणि अखेर १४ ऑक्टोबर १९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ही घटना देशाच्याच नव्हे तर जगाच्याही इतिहासात नोंद करणारी ठरली. या महामानवाला अभिवादन.
संतोष गोरे,
tv9 मराठी,
मुंबई.
981905604
http://santoshgore.blogspot.in/